राम मंदिराच्या उभारणीतून आपण आपली खरी ताकद जगाला दाखवून दिली - माधव भंडारी
पिंपरी, ता. २४ - ''गेल्या दीड-दोन दशकांत हिंदू समाजात अभूतपूर्व वैचारिक परिवर्तन झाले आहे. आपण राम मंदिराच्या उभारणीतून आपली खरी ताकद जगाला दाखवून दिली आहे. भारत आता अमेरिका, रशिया आणि चीनच्या बरोबरीने एक समर्थ 'हिंदू महासत्ता' म्हणून जागतिक स्तरावर उभा राहत आहे.'', असे प्रतिपादन भाजप पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी येथे केले.
सकल हिंदू समाज, सांगवी यांच्या वतीने रविवारी (ता. २२) जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक परिसरात 'हिंदू संमेलन' घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आमदार शंकर जगताप, भाजप गटनेते प्रशांत शितोळे नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक माऊली जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, उज्ज्वला ढोरे, वाघ महाराज, सुषमा तनपुरे, गणेश ढोरे उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, '' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदू समाज अभिमानाने एकत्र येत आहे. फाळणीनंतर हिंदू संस्कृती पुसण्याचे प्रयत्न झाले. पण राम जन्मभूमी आंदोलनाने आपली अस्मिता जपली. विशेष म्हणजे, जगाच्या इतिहासात हिंदू समाज हा एकमेव असा आहे, ज्याने कधीही कोणावर आक्रमण केले नाही.''
प्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि जालिंदर शिंदे यांनी पोवाडा सादरीकरण केले. केदार जोशी व विजय गोयंका यांनी सूत्रसंचालन केले.