आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहिम
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गावर हॉटेल, अन्नपदार्थ, प्रसाद व अन्नदान संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही मार्गावर मिळून २० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर - आळंदी परिसर, भवानी पेठ, हडपसर, सासवड (तीन वेगवेगळ्या ठिकाणी), वाल्हे या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर - इनामदार वाडा (देहू), विठ्ठल मंदिर (आकुर्डी), निवडुंगा विठ्ठल मंदिर (नाना पेठ, पुणे), नवीन पालखी तळ (कदमकावस्ती, लोणी काळभोर), भैरवनाथ मंदिर (यवत पालखी तळ), श्री विठ्ठल मंदिर (वरंवड), उडवंडी (बारामती), शारदा विद्यालय (बारामती), सणसर (बारामती), निमगांव केतकी (इंदापूर), पालखी तळ (इंदापूर), सराटी (इंदापूर) तपासणी होणार आहे.
पालखी मार्गावर वारकरी, भाविकांना संस्थांकडून तसेच हॉटेल्सकडून अन्नदान केले जाते. प्रसादवाटप केले जाते. रस्त्यांवरही खाद्यपदार्थांच्या गाड्या असतात. या सर्व ठिकाणी अन्न व औषध प्रशासन तपासणी करणार आहे. यामध्ये, बाटलीबंद पाण्याच्या लेबलची पाहणी केली जाईल, तळलेल्या पदार्थाची 'टीपीसी' मीटरद्वारे पडताळणी होईल, मिठाई, प्रसाद तसेच इतर विविध अन्नपदार्थ वापरण्याची मुदत तपासून मुदत संपलेल्या पदार्थांची विक्री थांबवली जाईल, खराब व खाण्यास अयोग्य अन्नपदार्थ नष्ट केले जातील.