अग्निवीर योजनेअंतर्गत देशसेवा करणाऱ्या तरुणांचे भविष्य होणार सुरक्षित
चार वर्षाच्या सेवेनंतर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत समावेश होणार
पुणे, ता. ६ - महाराष्ट्रातील अग्निवीर योजनेअंतर्गत देशसेवा करणाऱ्या तरुणांसाठी राज्यशासनाने छानशी योजना जाहीर केली आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर राज्यातील तरुणांमध्ये नोकरीबाबत असलेली अनिश्चितता दूर करण्यासाठी, राज्य सरकारने त्यांच्या पुनर्वसनाची तयारी सुरु केली आहे.
राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रातील अंदाजे ११,००० तरुणांची निवड करण्यात आली आहे. नियमांनुसार, यापैकी २५ टक्के (अंदाजे २,७५० तरुण) केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये कायमचे सामावून घेतले जातील.
उर्वरित ७५ टक्के तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने घेतली आहे. सैन्यातून निवृत्त होणाऱ्या तरुणांच्या कौशल्यांचा वापर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत केला जाईल. यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा एक विशेष अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. हा गट पुढील महिन्यात आपला अहवाल सादर करेल. देसाई यांनी स्पष्ट केले की, अभ्यास गटाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागांच्या मंत्र्यांशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर पुढील कार्यवाही होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.