राज्यात 'बालस्नेही ग्रामपंचायत' आणि 'बालस्नेही प्रभाग' संकल्पना राबवणार
पिंपरी, ता. २३ जुलै २०२६ - राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, तसेच बालकांमध्ये त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.
‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना ५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात विशेष अभियानाच्या स्वरूपात प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या माध्यमातून बालकांना त्यांचे हक्क, अधिकार आणि संरक्षणाच्या यंत्रणांची माहिती देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.
राज्य बाल हक्क आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या आढावा बैठकीत बालकांच्या मानसिक आरोग्य, मूल्यसंस्कार आणि जीवनकौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मानस’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पालघर जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘मानस’ प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य कीटचे उद्घाटनही मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
- महाराष्ट्र शासन, Maharashtra Government, महिला व बालविकास विभाग, Women and Child Development Department, बालहक्क, Child Rights, बाल संरक्षण, Child Protection
- बालस्नेही प्रभाग, Child Friendly Ward, आदिती तटकरे, Aditi Tatkare, महिला व बालविकास मंत्री, Women and Child Development Minister
- बालस्नेही ग्रामपंचायत, Child Friendly Gram Panchayat