आणीबाणीमध्ये सत्याग्रह करणाऱ्या कारावास भोगणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपतर्फे 'लोकशाही रक्षक पुरस्कार' प्रदान
आणीबाणीमध्ये सत्याग्रह करणाऱ्या कारावास भोगणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपतर्फे 'लोकशाही रक्षक पुरस्कार' प्रदान
पिंपरी, ता. २९ - देशातील आणीबाणीच्या कालखंडाला ५१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पक्षातर्फे 'लोकशाही रक्षक पुरस्कार' सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात आणीबाणीमध्ये सत्याग्रह करणाऱ्या आणि मिसा (MISA) कायद्यांतर्गत कारावास भोगणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
आमदार श्रीकांत भारतीय यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ''हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून नव्या पिढीसाठी संघर्षाचा दीपस्तंभ आहे. भारतीय जनता पक्षाचा उदय हा आणीबाणीच्या काळात लोकांनी दिलेल्या समर्पणातून झाला असून, 'संघर्ष' हा भाजपचा पक्षाचा डीएनए आहे.'' इतिहास हा केवळ डोक्याने वाचायचा नसून तो हृदयाने समजून घ्यायचा असतो, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना लोकशाहीसाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव करून दिली आणि आपापसातील समन्वय वाढवण्याचे आवाहन केले.''
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आणीबाणीच्या काळातील भीषण आठवणींना उजाळा देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली. ''हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता, ज्या दिवशी जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले गेले होते. मात्र, अनेक राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास सोसला आणि अमानुष छळ सहन केला, परंतु हुकूमशाहीसमोर गुडघे टेकले नाहीत. त्यांच्या याच त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत.'', असे ते म्हणाले.
या सोहळ्यात आणीबाणीमध्ये सत्याग्रह करणाऱ्या आणि मिसा (MISA) कायद्यांतर्गत जेल भोगणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते 'लोकशाही रक्षक पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन भाजप संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले. या कार्यक्रमास आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जेष्ठ नेते मधू जोशी, आणीबाणी सत्याग्रही संघटनेचे आबा खांबे, माजी अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण नाईक, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी विरोधी पक्षनेत्या डॉ.गिताताई आफळे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, संजय पटनी, संतोष तापकीर, कैलास सानप, अजय पाताडे, पोपट हजारे, राजू दुर्गे, देवदत्त लांडे, अजित कुलथे, नंदू भोगले, यांच्यासह सर्व मोर्चे, आघाडी व प्रकोष्ठ यांचे अध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष अनेक पदाधिकारी, विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले. मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.