अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना, विशेष फेरीतील प्रवेश वाटप प्रक्रिया ७ ऑगस्टला
पिंपरी, ता. ४ ऑगस्ट २०२६ - शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सुमारे १२.९८ लाख विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीअंतर्गत नोंदणी तसेच भाग-१ मधील आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. याच कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरून अर्ज अंतिम स्वरूपात लॉक करता येणार आहे.
विशेष फेरीतील प्रवेश वाटप प्रक्रिया ७ ऑगस्ट रोजी पार पडणार असून ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रवेश वाटपाची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येणार आहे. प्रवेश वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येईल. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज मागे घ्यावेत. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ mahafyjcadmissions.in तसेच हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.