शाळा-महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - पोलिस आयुक्त अमितेश कुमार
शाळा-महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - पोलिस आयुक्त अमितेश कुमार
पुणे, ता. २४ - ''किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण आणि त्यातून घडणारे गुन्हे चिंताजनक आहेत. शाळा-महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थ किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पबमधील 'फ्रेशर्स पार्टी'मध्ये मद्यप्राशन करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरही आमची नजर आहे. ही समस्या सामाजिक आहे. नागरिकांनी दबावगट निर्माण करून संशयास्पद हालचालींची माहिती ११२ क्रमांकावर द्यावी. लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्थाचालक आणि शिक्षकांच्या मदतीने अंमली पदार्थमुक्त प्रभाग हे अभियान यशस्वी केले जाईल.'' असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधीनतेच्या जोखमीवर आधारित अहवालाचे प्रकाशन गुरुवारी (ता. २४) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे विश्वस्त नंदकिशोर राठी, दर्शन मुंदडा, ज्ञान प्रबोधिनीच्या मानस प्रज्ञा संशोधिका विभागाच्या संचालिका डॉ. अनघा लवळेकर आदी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले की, ''तरुण पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शहर पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. केवळ गुन्हेगारांवर कारवाई करून न थांबता, शहरात लोकसहभागातून अंमली पदार्थमुक्त प्रभाग अभियान राबविण्यात येणार आहे.''
सदर अहवालामध्ये, दर सहापैकी एका किशोरवयीन मुलाने एकदा तरी मद्यप्राशन केले आहे, ४० टक्के विद्यार्थ्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम माहीत असूनही त्याचे सेवन केले, सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांच्या परिसरात अमली पदार्थ सहज उपलब्ध आहेत...या बाबी निदर्शनास आल्या आहेत.
याबाबत, बोलताना ताराचंद रामनाथ सेवा संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर राठी म्हणाले की, ''हा अहवाल पुण्यातील युवकांमधील व्यसनाधीनतेचा मोठा धोका समजून घेण्यासाठी आणि वेळीच योग्य ती प्रतिबंधात्मक पावले उचलण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.''
''व्यसनांना आळा घालण्यासाठी, समाजात व्यापक जनजागृती करण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृतीचा एक भक्कम पाया रचण्यासाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरेल.'', असे मत ज्ञान प्रबोधिनी मानस प्रज्ञा संशोधिकेच्या संचालिका डॉ. अनघा लवळेकर यांनी व्यक्त केले.