जुन्या भांडणाच्या रागातून युवकाचे अपहरण, पोलिसांच्या शीघ्र प्रयत्नांनी युवकाची सुटका व आरोपींना अटक, खेड तालुक्यातील घटना
जुन्या भांडणाच्या रागातून युवकाचे अपहरण, पोलिसांच्या शीघ्र प्रयत्नांनी युवकाची सुटका व आरोपींना अटक, खेड तालुक्यातील घटना
पुणे, ता. १४ - जुन्या भांडणाचा राग धरुन २६ वर्षीय युवकाचे अपहरण केल्याची घटना रविवारी (ता. १२) खेड तालुक्यातील वासुली परिसरातील अॅमेझॉन कंपनीच्या गेटसमोर घडली. या प्रकरणी सहा आरोपी युवकांना अटक करण्यात आली आहे. एक अल्पवयीन गुन्हेगारही यात सामील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींमध्ये सागर बाळू जावळे (वय ३४ वर्षे, रा. कुरकुंडी), नितीन संजय थिटे (वय २७ वर्षे, रा. रेटवडी ता.खेड), सौरभ ऊर्फ सोन्या अनिल ढोरे (वय २८ वर्षे, रा. वरची भाबरवाडी ता.खेड), अजय भरत गोपाळे (वय २३ वर्षे, रा. अहिल्यादेवी चौक, खंडोबामाळ, खेड, कुणाल प्रशांत चव्हाण (वय २३ वर्षे, रा.अहिल्यादेवी चौक, खंडोबा माळ, खेड) व ओमकार दशरथ कोरडे (वय २४ वर्षे, रा. सांडभोरवाडी ता.खेड) यांचा समावेश आहे.
रविवारी (ता. १२) रात्री ९.०० वाजता लाल रंगाची थार व पांढऱ्या रंगाची नेक्सॉन या वाहनांतून आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (वय २६, रा. कोरेगाव बुद्रुक, ता. खेड) याचे अपहरण केले. ऋषीकेश कल्हाटकर व आरोपी सागर जावळे यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणाने ऋषीकेशला जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले. आरोपींनी त्याला जबरदस्तीने वाहनात बसवून अज्ञात स्थळी नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत समर्थ उर्फ सोन्या माणिक तावरे (वय १८ वर्षे) याने फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ तपास करुन अपहृत ऋषीकेशची सुटका केली.
सदर प्रकरणात आरोपींविरोधात उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १३) भारतीय न्याय संहिता कलम १४०(१), ३५१(४), ३(५), १८९(२), १९०, १९१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.