मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर येणार संरपंचांचे प्रशासकराज
पिंपरी, ता. २१ - राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे तसेच ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका विविध प्रशासकीय कारणांमुळे वेळेत घेता आल्या नाहीत, अशा ग्रामपंचायतींवर 'प्रशासक' नेमले जाणार आहेत आणि हे प्रशासक संरपंच असणार आहेत. हा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्राच्या असाधारण भाग चार-ब मध्ये याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे तसेच ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका विविध प्रशासकीय कारणांमुळे वेळेत घेता आल्या नाहीत, अशा ग्रामपंचायतींवर सरपंच हे प्रशासक व सदस्य हे प्रशासकीय समितीत असतील. संबंधित ग्रामपंचायतींचा नियमित कारभार खंडित होऊ नये आणि प्रशासन सुरळीत चालावे, यासाठी ही तरतूद लागू करण्यात आली असल्याचे अधिसूचनेत सांगितले आहे. अधिनियम व नियमांनुसार दिलेले सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्यांचे पालन करण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या आहेत.
आदेशातील ठळक मुद्दे -
- ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे आणि निवडणूक झालेली नाही, त्या ठिकाणी सरपंच हे प्रशासक पदावर नेमले जातील.
- संबंधित ग्रामपंचायतीतील विद्यमान सरपंचांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा नवीन ग्रामपंचायत स्थापन होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळता येणार आहे.
- पंचायतचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे.