'एसटी'ला दररोज होतो १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा
पुणे, ता. 16 - एसटीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये आणि खर्च ३३ कोटी रुपये आहे. त्यामुळे दररोज सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ११ हजार ४७५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ हजार ०६६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे एसटीला ५९१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे आठ विभाग नफ्यात होते. उर्वरित २३ विभागांपैकी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या मोठ्या विभागांचा तोटा वाढत आहे.
या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करुन उपलब्ध बस आणि मनुष्यवळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. उर्वरित दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.
ते म्हणाले, "एसटी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाला सक्षम नेतृत्व मिळणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार आहे."