मुंबई विद्यापीठाला 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई विद्यापीठ' असे नाव द्यावे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची मागणी
मुंबई विद्यापीठाला 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई विद्यापीठ' असे नाव द्यावे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची मागणी
पुणे, ता. १५ - मुंबई विद्यापीठाला 'स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई विद्यापीठ' असे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
पत्रात म्हटले आहे की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणजे केवळ पराक्रम आणि बलिदानाचे प्रतीक नव्हे, तर ते बहुभाषिक विद्वान आणि जागतिक दर्जाचे साहित्यिकही होते. त्यांनी 'बुधभूषण', 'नखशिख', 'सातशतक' आणि 'नायिकाभेद' यांसारख्या अमूल्य ग्रंथांची निर्मिती केली. मात्र त्यांच्या या साहित्यिक वारशाकडे शासनदरबारी दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने हा पत्रव्यवहार केला आहे.
राज्यातील प्रत्येक विद्यापीठात संभाजी महाराजांच्या नावाने साहित्य व संशोधन अध्यासन सुरु करावे, संभाजी महाराजांच्या साहित्याचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र शासकीय प्रकाशन समिती नेमावी, 'बुधभूषण' सारख्या ग्रंथांचा जागतिक भाषांमध्ये अनुवाद करुन हा साहित्यिक वारसा जगभर पोहोचवावा, अशा मागण्या पत्रात केल्या आहेत.
"छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. त्यांची अमूल्य ग्रंथसंपदा आहे. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.", असे डॉ. शरद गोरे यांनी सांगितले.