नसरापूर घटनेचा तपास 'एसआयटी'कडे, सहा अधिकाऱ्यांचे पथक स्थापन
पुणे, ता. ४ - भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या घटनेचा तपास आता विशेष तपास पथकद्वारे (एसआयटी) केला जाणार आहे. करण्यासाठी राज्य सरकारकडून ६ अधिकाऱ्यांची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे.
नसरापूरातील बालिकेवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात जनता संतप्त झाली आहे. या आरोपीला तत्काळ ठेचून काढण्याची, फाशी देण्याची मागणी जनतेने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी राज्य सरकार न्यायालयाकडे विशेष विनंती करणार आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर, म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. या घटनेची बालहक्क संरक्षण आयोगाने आणि राष्ट्रीय महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली आहे.
सरकारने तत्परतेने पावले उचलत एसआयटी स्थापन केली आहे. त्यात सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी दोन अधिकारी या महिला आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणातील चिमुकलीवर शनिवारी (ता. २) रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिच्या वडिलांनी उद्ग्विग्नतेने मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, असे सोशल मिडीयाद्वारे सांगितले आहे. या घटनेतील पिडीत कुटुंबाला मनोधैर्य योजनेंतर्गंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्यााण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.