इंद्रायणी नदी वॉटर बॉडी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी मंजुरी
इंद्रायणी नदी वॉटर बॉडी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी मंजुरी
पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - इंद्रायणी नदी वॉटर बॉडी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी मंजुरी देण्यात आली. हा विषय ऐनवेळी सादर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. मात्र, त्यांचा विरोध नोंदवून विषय मंजूर करण्यात आला.
मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदी उगम पावते. पुढे ती तीर्थक्षेत्र देहूगाव, आळदीमार्गे तुळापूर येथे जाऊन भीमा नदीला मिळते भीमा नदी पुढे मुळा मुठा नदीला घेऊन उजनी धरण मार्गे पंढरपूरला जाते. पिंपरी-चिंचवड शहरातून १८.८० किलोमीटर अंतर नदीचे पात्र आहे. नदी शहरात येताच अनेक गटारी, नाले नदीत घंट मिसळतात त्यामुळे नदीचा रस बदलू लागतो. निर्मळ पाण्याला नाल्याचे रूप येते. इंद्रायणीत जलपर्णी दिसते कुदळवाडी नाल्यातून औद्योगिक कंपन्यामधील रसायन मिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे महापालिकेने इंद्रायणी नदी वॉटर बॉडी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प आखला. त्याला राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्यानंतर पर्यावरण विभागाने ४४३ कोटी ५१ लाख रुपयाची निविदा प्रसिद्ध केली. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत आाठ ठेकेदारांनी सहभाग घेतला, त्यापैकी तीन ठेकेदाराच्या निविदा पात्र झाल्या. त्यातील मे. एल. सी. इन्फ्रा. प्रो. प्रा. लि. यांची तीन टक्के कमी दराची म्हणजे ४३० कोटी ७५ लाख ६१ हजार ७७७ रुपयांची निविदा स्वीकारण्यात आली आहे.
या बाबतच्या प्रस्तावाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दुपारी एक वाजून ३६ मिनिटांनी मान्यता दिली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता स्थायी समितीसमोर तात्काळ आयत्यावेळी हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. ४३० कोटींचा विषय रीतसर का आणला नाही, एवढा मोठा विषय आयत्यावेळी आणण्याची घाई का केली, विषयाची माहिती देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, आमदारांचा दूरध्वनी आल्याने आयत्यावेळी विषयाला मंजुरी दिली जात आहे का, असा सवाल विरोधी सदस्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, ''या निविदा प्रक्रियेत 'रिंग झाली आहे. पाच ठेकेदाराना जाणीवपूर्वक अपात्र करण्यात आले आहे. रीतसर विषय आणपणे आवश्यक होते. एवढी घाई कशासाठी केली जात आहे नदीयुधारच्या कामाला विरोध नसून प्रक्रियेला आहे.''
त्यावर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले की, ''पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आयत्यावेळी इंद्रायणी नदी वॉटर बॉडी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पाचा विषय आणला व मंजूर करण्यात आला आहे.''