रेशन ग्राहकांची खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकारकडून होणार सर्वेक्षण, कंपनीची नियुक्ती
पिंपरी, ता. २५ - रेशन ग्राहकांची खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशन ग्राहकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी खासगी कंपनी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनी घरोघरी जाऊन ग्राहकांचे सर्वेक्षण करणार आहे. खातरजमा केल्यानंतर त्यानंतर याचा अहवाल ही कंपनी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाला देणार आहे. यासाठी ग्राहकांची यादी शासनाने निश्चित केली आहे.
शासनाने दिलेल्या माहितीनुसार, शासनाने निर्धारित केलेल्या यादीमधील व्यक्तींची आर्थिक स्थिती विविध निकष लावून ठरवली गेली आहे. सर्वेक्षणातून किती ग्राहकांना रेशनच्या धान्याची निकड आहे. वर्षातील किती महिने त्यांनी धान्य घेतले आहे, याची माहिती मिळणार आहे.
या सर्वेक्षणात ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, महिन्याला मिळणारे धान्य, सर्वात जास्त वापरला जाणारा धान्य प्रकार, रेशनवरील अवलंबित्व, नोकरी व्यावसायाचे स्वरूप, कुटुंबाची आर्थिक प्राप्ती या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाईल. प्रत्यक्ष लाभार्थी कोण आहेत याचीही खातरजमा होईल. सर्वेक्षणासाठी एक खासगी कंपनी नियुक्त करण्यात आली असून ही कंपनी स्वतंत्रपणे हे सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाचा सहभाग अत्यल्प असेल.