आरटीई प्रवेशासाठी राज्यातून २ लाख ८८ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त
प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार, शिक्षण विभागाची माहिती
पुणे, ता. २ - राईट टू एज्युकेशन कायद्यान्वये शाळा प्रवेशासाठी राज्यभरातून २ लाख ८८ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त आले आहेत. प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत आणि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
'आरटीई' अंतर्गत शाळा प्रवेशासाठी यंदा राज्यातील एकूण ८ हजार ७०१ शाळांमध्ये १ लाख १४ हजार ८३३ जागा उपलब्ध आहेत. आधी आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा निवडण्याची अट शिक्षण विभागाने ठेवली होती. ही अट उच्च न्यायालयाने रद्द केली व पालकांना पुन्हा अर्ज भरण्याची ३१ मार्चपर्यंत संधी दिली. दिलेल्या मुदतीत २ लाख ८८ हजारांहून अधिक मुलामुलींच्या प्रवेशासाठी पालकांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी जवळपास तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते, असे शिक्षण विभागाने सांगितले.
प्राप्त अर्जांची आकडेवारी -
- पुणे जिल्ह्यात ९१६ शाळा असून १८ हजार ६० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे आणि ५४ हजार ४८३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
- अहिल्यानगर जिल्ह्यात ३४८ आहेत. प्रवेशासाठी एकूण ३ हजार ७६५ जागा आहेत व ९ हजार २०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
- छत्रपती संभाजीनगरमध्ये ५४१ शाळा आहेत. ४ हजार ९११ जागा उपलब्ध असून एकूण १७ हजार ७७ पाल्यांचे अर्ज आले आहेत.
- मुंबईमध्ये २५२ शाळा आहेत. ४ हजार ५५८ जागांसाठी १० हजार ३१२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
- नागपूरमध्ये ६४२ शाळा आहेत. ७ हजार ८१ जागांसाठी २५ हजार ३३१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
- नाशिकमध्ये ३९४ शाळा आहेत. ५ हजार ६७३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे आणि १७ हजार ४७७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
- ठाणे जिल्ह्यात ६१५ शाळा आहेत. ११ हजार ७५४ जागांसाठी २४ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले आहेत.