अनाथ बालकांना मायेची सावली देणाऱ्या स्नेहछाया परिवाराचा ७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
अनाथ बालकांना मायेची सावली देणाऱ्या स्नेहछाया परिवाराचा ७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पिंपरी, ता. ७ - जीवन विद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे संचलित दिघी येथील स्नेहछाया परिवाराचा ७ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी स्नेहछाया परिवारातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन त्यांना उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले. ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त सात वर्षांपूर्वी स्नेहछाया परिवाराची स्थापना झाली आहे.
दिघी येथील संत गजानन महाराज सांस्कृतिक भवनामध्ये (मॅक्झिन चौक) हा समारंभ पार पडला. दीपप्रज्वलन व वृक्षपूजनाने समारंभास प्रारंभ झाला. स्नेहछाया परिवारातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने आणि योगासनांच्या सुंदर प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, 'अन्न व औषध प्रशासन, पुणे'चे सेवानिवृत्त उपायुक्त श्यामसुंदर प्रतापवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनपर विचारांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना शिक्षण, संस्कार व सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका व महिला व बालकल्याण सभापती राणी पठारे, नगरसेवक उदय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, कुलदीप परांडे, रवी चव्हाण, सुनील काकडे, कैलास बोरसे, के. के. जगताप, विश्वास पौळ, मयूर फापाळे, संतोष केकाण, शिवाजी शिंदे यांनीही उपस्थित राहून स्नेहछाया परिवाराला शुभेच्छा दिल्या. स्नेहछाया परिवाराचे प्रमुख प्रा. दत्तात्रय इंगळे व सारिका इंगळे यांचा विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. क्रिकेट टायर्स अँड ऑटो सर्विसचे वैभवशेठ काळजे तसेच अनंत मिल्क प्रायव्हेट लिमिटेडचे नितीन थोपटे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले. सारिका इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहछाया परिवारातील सल्लागार मनोहर कोलते, योगगुरु विजय दाते व अजिंक्य शिंदे,विक्रम साखरे, शंकर गाडे, अमित झोंबाडे, दगडू राम शिकारे, सुनील इंगळे, अपूर्वा झोंबाडे, सुरेंद्र आवाड, प्रसाद पुजारी, नानासाहेब इंगळे, निखिल टेकवडे, पराग शिळीमकर, आदेश दाभाडे, संस्कृती इंगळे, उदय हाडवळे तसेच सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक व हितचिंतक यांनी संयोजन केले. हा सोहळा केवळ वर्धापन दिनापुरता मर्यादित न राहता अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प दृढ करणारा ठरला.