दिग्गज गिर्यारोहकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ दुर्गप्रेमी आनंद पाळंदे यांच्या 'Walk Maharashtra' पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
दिग्गज गिर्यारोहकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ दुर्गप्रेमी आनंद पाळंदे यांच्या 'Walk Maharashtra' पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - ज्येष्ठ दुर्गमहर्षी आणि साहित्यिक गो. नि. दांडेकर (गोनीदा) यांच्या स्मृतीदिनाचे म्हणजेच 'दुर्ग वारी दिवसा'चे औचित्य साधून हबुधवारी (ता. ८) पुण्यात एका विशेष आणि अनौपचारिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मराठी भाषेचे खंदे समर्थक आणि ज्येष्ठ दुर्गप्रेमी आनंद पाळंदे यांनी आंग्ल (इंग्रजी) भाषेत लिहिलेल्या 'Walk Maharashtra' या नवीन पुस्तकाचे अतिशय साधेपणाने, मात्र तितक्याच दिमाखदार वातावरणात प्रकाशन करण्यात आले.
हॉटेल वृंदावन येथे पार पडलेला हा सोहळा अत्यंत साधा असला, तरी व्यासपीठावर खऱ्या अर्थाने हिमालयाची आणि एव्हरेस्टची उंची गाठलेले दिग्गज उपस्थित असल्याने या सोहळ्याला एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष, शिवछत्रपती व 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार' विजेते आणि 'गिरिप्रेमी'चे संचालक व वर्तमान अध्यक्ष श्री. उमेश झिरपे, त्यांच्यासोबतच आय.आय.टी.चे (IIT) स्नातक असूनही भौतिक सुखांचा मोह सोडून स्वतःला पूर्णपणे गिरीभ्रमणात झोकून देणारे, 'Gen Z' चे प्रतिनिधी आणि नुकतेच २०२६ मध्ये एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलेले तरुण एव्हरेस्टवीर चि. विवेक शिवदे उपस्थित होते. तसेच, सह्याद्री भ्रमणासोबतच कच्छ ते पंजाबच्या वाळवंटात मृगजळ शोधणारे ध्येयवेडे शिक्षक आणि अनवट पुस्तकांना हक्काची सावली देणारे प्रफुल्लता प्रकाशनाचे संचालक श्री. गुलाबराव सपकाळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या तीनही दिग्गजांनी समयाभावामुळे प्रत्येकी अवघी ५ मिनिटे आपले मनोगत व्यक्त केले. परंतु, तितक्या अल्प वेळातही त्यांनी मांडलेला गिर्यारोहणाचा आवाका, त्यांचे थरारक अनुभव आणि अफाट कर्तृत्व ऐकून उपस्थितांचे डोळे दिपले आणि अंगावर काटा आला.
या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन नरेंद्र मुजुमदार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी बँक ऑफ बडोदा समूहाच्या वतीने, बँकेचे भूतपूर्व संचालक व 'अखिल भारतीय बँक ऑफ बडोदा सेवानिवृत्त अधिकारी संघटनेचे' राष्ट्रीय महासचिव चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले. अजित नंदर्गिकर, संजय कान्हेरे आणि बॉब समुद्र समूह मित्र परिवार (पुणे) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.