महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीज दरात कपात लागू
पुणे, ता. २७ - महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीज दरात कपात लागू होणार आहे. नवीन दरांनुसार, विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यांमध्ये दरकपात करण्यात आली आहे. विद्युत नियामक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा यांसारख्या वीज वितरण कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर आधारित नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.
वीज दरातील कपातींमुळे घरगुती ग्राहकांना तसेच छोट्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरांमध्ये कपात करण्याचे आश्वासन दिले होते. ऊर्जा विभागाचा कार्यभार सांभाळतानाही त्यांनी अधिकाऱ्यांना वीज दर कमी करण्याचे निर्देश दिले होते. आता नवीन वीजदर जाहीर झाले आहेत.
- वीजदर कपात अशी .....
- ० ते १०० युनिट्सपर्यंतच्या वापरासाठीचा दर ₹४.७६ वरून कमी करुन ₹४.३० केला आहे.
- १०१ ते ३०० युनिट्सच्या टप्प्यासाठी दर ₹७.९६ वरून ₹७.१० पर्यंत केला आहे.
- ३०१ ते ५०० युनिट्ससाठी हा दर ₹१३.५५ वरून ₹११.६४ केला आहे.
- ५०० युनिट्सपेक्षा अधिक वापरासाठीचा दर ₹१४.५५ वरून कमी करून ₹१२.६४ प्रति युनिट केला आहे.