राज्यभरातील शालेय विद्यार्थिनींना दिले जाणार स्वसंरक्षणाचे धडे
पिंपरी, ता. ४ - मुलींना लहानपणापासून शारिरीर व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाकडून 'राष्ट्र प्रथम' अभियानांतर्गत राज्यभरातील २१ हजार २७९ शाळांत मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक व दहा हजार माजी सैनिकांमार्फत सैनिकी शिक्षणही देण्यात येणार आहे. शहरातील शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये मार्शल आर्टस्, योगासने व प्राणायाम शिकवले जाणार आहे. याशिवाय, दहा हजार प्रबोधनकारांमार्फत विद्यार्थ्यांत राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे म्हणाले, ''पुस्तकी ज्ञान महत्वाचे आहेच. त्याबरोबर, संकटसमयी स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता हीच खरी शक्ती आहे. माजी सैनिकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारे सैनिकी शिक्षण मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. 'राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षणा'मुळे शाळांतील लेकी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होतील.''