हिंजवडी आयटी पार्क व परिसरात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक
हिंजवडी आयटी पार्क व परिसरात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक
पिंपरी, ता. ३० - हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबची सर्व कामे ३१ मे २०२६ पूर्वी करणे बंधनकारक केले आहे. नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्ती ओढवल्यास संबंधित अधिकाऱ्यांना ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ जबाबदार धरले जाईल, अशा कडक सूचना इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.
आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात बुधवारी (२९ एप्रिल) आयोजित पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ३१ मे २०२६ पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बैठका नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, असे स्पष्ट करत महानगर आयुक्तांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), एमआयडीसी, पीएमआरडीए, संबंधित ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. विशेषतः प्रमुख नाले आणि आयटी पार्कमधील अंतर्गत रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी जबाबदारी एकमेकांवर ढकलू नये, असे त्यांनी सांगितले.
पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना महानगर आयुक्तांनी महत्त्वाचे निर्देश दिले. त्यात हिंजवडी-माण परिसरातील मुख्य नाले तातडीने मोकळे करून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करावे, नाल्यांच्या प्रवाहात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे ३१ मेपूर्वी हटवावीत, तसेच नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहातून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पीएमआरडीएसह एमआयडीसी व संबंधित ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस शाखेने सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याचे बैठकीत ठरले. यावेळी हिंजवडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आयटी पार्क परिसरातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती सादर केली.
या बैठकीला पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहआयुक्त पूनम मेहता, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) राहुल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल यांच्यासह जिल्हा परिषद, वन विभाग आणि एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंजवडी व माण येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई...
“पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा नियोजनाअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित केली जाईल.”
– डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए