शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे, ता. २८ - ''एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना बियाण्यांची टंचाई भासणार नाही, यादृष्टीने मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवूक करावी.'', असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बियाणे उत्पादक कंपन्यांना राज्यस्तरीय कार्यशाळेत दिले. सर्व बियाणे उत्पादक, वितरक, विक्रेत्यांनी समन्वयाने कामे करावे, या उद्देशाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.
शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय येथे आयोजित बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महासंचालक राहूल माहिवाल, राष्ट्रीय सूचना केंद्राचे वरिष्ठ संचालक अविनाश पेडगावकर, संचालक विस्तार व प्रशिक्षण रफीक नाईकवाडी, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंबादास मिसाळ, कृषी उपसंचालक बियाणे व नोडल अधिकारी साथी डॉ. प्रिती सवाईराम, यांच्यासह सियाम, मासा व माफदा बियाणे उत्पादक, विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेते उपस्थित होते.
''महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून विकसित महाराष्ट्र २०४७ च्या संकल्पपूर्तीच्यादृष्टीने काम करावे. बोगस बियाण्यांवर आळा घालून शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याकरिता साथी पोर्टलचा वापर करावा.'', असे ॲड. जयस्वाल यावेळी म्हणाले.