सहकार मंत्रालयाकडून मुंबई आणि पुण्यात 'भारत टॅक्सी सेवा' सुरु, 'आरटीओ'ने निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारले जाणार
सहकार मंत्रालयाकडून मुंबई आणि पुण्यात 'भारत टॅक्सी सेवा' सुरु, 'आरटीओ'ने निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारले जाणार
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - सहकार मंत्रालयाने मुंबई आणि पुण्यात 'भारत टॅक्सी' ही नवी सेवा सुरू केली आहे. यामध्ये प्रवाशांकडून 'आरटीओ'ने निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारले जाणार आहे. आतापर्यंत तब्बल ३५ हजार चालकांनी 'भारत टॅक्सी'साठी नोंदणी केली आहे. आगामी काळात पुण्यात ही सेवा आणखी वेगाने विस्तारणार आहे.
भारत टॅक्सी ही सेवा पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोनच प्रमुख शहरांमध्ये सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ येथे या सेवेचा नुकताच प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 600 टॅक्सींचे अनावरण झाले. ही सेवा पूर्णपणे सहकारी संस्थेच्या माध्यमातून तसेच सहकाराच्या तत्त्वावर चालवली जाणार आहे.
भारत टॅक्सी अॅप हे अॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स त्यांच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. हे अॅप मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहे. एकाच मोबाईल अॅपद्वारे प्रवाशांना कार, ऑटोरिक्षा, बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या 1.5 किलोमीटर प्रवासासाठी प्रवाशांकडून फक्त 31 रुपये भाडे आकारले जाणार आहे तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 21 रुपये दर ठरवण्यात आलेला आहे. बुकिंगनंतर साडेचार मिनिटांत कॅब उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे.
याबाबत बोलताना भारत टॅक्सी सेवेचे पुणे शहरप्रमुख मोहित मित्रा म्हणाले, ''भारत टॅक्सी'च्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्णपणे सरकारी दरात सेवा दिली जात आहे. यात प्रवाशांची कोणतीही आर्थिक लूट होणार नाही आणि त्यांना अवघ्या साडेचार मिनिटांत सुरक्षित सेवा मिळेल. या पारदर्शकतेमुळेच आज ३५ हजार चालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून नोंदणी केली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.''