महाराष्ट्रात १ मेपासून जनगणना सुरु, नागरीकांनी संपूर्ण व अचूक माहिती द्यावी, सरकाराचे आवाहन
महाराष्ट्रात १ मेपासून जनगणना सुरु, नागरीकांनी संपूर्ण व अचूक माहिती द्यावी, सरकाराचे आवाहन
पुणे, ता. ३० - जनगणनेचा देशव्यापी कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात १ मेपासून जनगणना सुरु होणार आहे. जनगणना कायदा १९४८ नुसार, जनगणना कर्मचाऱ्यांना चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे किंवा सहकार्य न करणे हे दंडनीय आहे. यासाठी १ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी अचूक, संपूर्ण आणि प्रामाणिक माहिती देण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
सरकारने सांगितले आहे की, जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून, देशाच्या भविष्यातील नियोजन, विकास योजना, आरक्षण धोरणे, संसाधन वाटप आणि धोरणनिर्मितीसाठी आधारभूत ठरणारी आहे. ग्रामीण-शहरी विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार यासारख्या क्षेत्रांसाठी हे नागरीकांचे माहिती संकलन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जनगणना मोहीम यशस्वी करणे प्रत्येक भारतीय नागरीकाची जबाबदारी आहे. सर्व नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि उपलब्ध असल्यास स्व-गणनेचा पर्याय वापरावा.
ही जनगणना भारतातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीसोबतच मोबाइल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १ ते १५ मे या कालावधीत ज्यांना शक्य आहे ते स्वतःची माहिती अधिकृत पोर्टलवर भरु शकतात. इतरांसाठी १६ मे पासून १४ जूनपर्यंत नेहमीच्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यातील जनगणना होणार आहे. जनगणेत कुटुंबाबद्दलची माहिती, घराबद्दलची माहिती, मूलभूत सुविधांबद्दल माहिती व मालमत्ता आणि संवादाची साधने याबाबत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत.