सीआयएससीई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे, ता. ३० - द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सतर्फे (सीआयएससीई बोर्ड) घेण्यात आलेल्या बारावी व दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
आयसीएसई (Indian Certificate of Secondary Education) म्हणजे दहावीच्या परीक्षेत ९९.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आणि आयएससी ( Indian School Certificate) म्हणजे बारावीच्या परीक्षेत ९९.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात वाढ झाली आहे.
आयसीएसईच्या परीक्षेत एकूण ६७ विषयांचा समावेश होता. यात २० प्रादेशिक भाषा आणि १४ परदेशी भाषा आणि एका क्लासिकल भाषा विषयाचा समावेश आहे.
तर, आयएससी परीक्षा ४५ विषयांमध्ये घेण्यात आली असून त्यात १३ प्रादेशिक भाषा, दोन परदेशी भाषा आणि दोन क्लासिकल भाषा विषयांचा समावेश आहे.
यंदा महाराष्ट्रातील २७९ आयसीएसई शाळांमधून ३० हजार ३९३ आणि ८१ आयएससी शाळांमधून चार हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यात आयसीएसई परीक्षेत ९९.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर आयएससी परीक्षेत ९९.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.