डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे असंघटित कष्टकऱ्यांच्या सन्मानासाठी आमचा लढा सुरु राहील - डॉ. बाबा कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे असंघटित कष्टकऱ्यांच्या सन्मानासाठी आमचा लढा सुरु राहील - डॉ. बाबा कांबळे
पिंपरी, ता. १५ - ''महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला ‘एक व्यक्ती, एक मत’हा अधिकार देऊन समानतेची क्रांती घडवून आणली. आज गरिबाच्या मतालाही पंतप्रधानांच्या मताइतकीच किंमत आहे. मात्र, दिवसरात्र कष्ट करणाऱ्या रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि असंघटित कष्टकऱ्यांना समाजात अद्याप सन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळालेले नाही. त्यांच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांनी आमचा लढा सुरु आहे व सुरु राहील.'' असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न डांगे चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँडच्या वतीने आयोजित बाबासाहेबांच्या जयंती उत्सवात रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन केले. या कार्यक्रमाला वाकड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू दत्तात्रय डेरे, हवालदार पोट साहेब, आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पिंपरी-चिंचवड शहरी युवक अध्यक्ष विशाल ससाने, रिक्षा ब्रिगेडचे महाराष्ट्र मुख्य संघटक धनंजय कुदळे, विद्यार्थी वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप अय्यर, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शेलार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबा कांबळे पुढे म्हणाले, ''देशात ४५ कोटींहून अधिक असंघटित कामगार आहेत. या कष्टकऱ्यांच्या श्रमाला किंमत मिळायला हवी. कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना ओळख आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंडळाचे कार्ड प्राप्त झाल्यावर रिक्षा चालक कष्टकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा मिळेल. तसेच, कष्टकऱ्यांना म्हातारपणी पेन्शन मिळावी ही आमची प्रमुख मागणी असून, या लढ्यात सर्व ऑटो-टॅक्सी चालक आणि कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.''
संग्राम शिंदे, मयूर आढगळे, लाजित बागवान, आसिफ शेख, लक्ष्मण ओवाळ,मच्छिंद्र जोगदान, अक्षय गायकवाड, अर्जुन धोत्रे, शुभम कदम, मारुती शितोळे, विजयकुमार सूतकर, अजित शितोळे, बापू कांबळे, सागर लोंढे आणि विजय जावळे, अमित धुमाळ यांनी या कार्यक्रमांचे संयोजन केले.