'फ्लोरिकल्चर' फुल उत्पादकांच्या प्रश्नांची शासनाने योग्य दखल घ्यावी, अन्यथा बेमुदत उपोषण
फ्लोरिकल्चर पार्क फुल उत्पादक असोसिएशनाचा इशारा
पिंपरी, ता. २८ - बळीराजा अनुदान योजना अचानक बंद केली, मागील तीन वर्षांची बिले एकरकमी आकारणे, थकबाकीच्या कारणास्तव वीज जोड तोडणीची कारवाई यामुळे तळेगाव एमआयडीसीतील फ्लोरिकल्चर पार्कमधील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या प्रश्नांची योग्य दखल न घेतल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा फ्लोरिकल्चर पार्क फुल उत्पादक असोसिएशनचे सचिव मल्हारराव ढोले यांनी दिला.
यावेळी फुल उत्पादक शेतकरी मयूर भोसले, शुभाग बेरी, अद्वैत भट उपस्थित होते. ढोले म्हणाले, ''शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी फ्लोरिकल्चर पार्क फुल उत्पादक असोसिएशनने मुख्यमंत्री, उर्जामंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ''
''अनेक दिवसांपासून अनुदान रद्द झाल्यामुळे जादा रकमेची बिले आणि एकरकमी वीज बिले आल्यामुळे बिले भरणे अर्थिकदृष्ट्या अडचणीचे झाले आहे. वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत निर्णय लागेपर्यंत वीजपुरवठा खंडित करु नये, मागील तीन वर्षांची वीज बिले हप्त्यांमध्ये वसूल करावीत, बळीराजा अनुदान योजना तत्काळ पूर्ववत करावी या फ्लोरीकल्चर शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.'' असे ढोले यांनी सांगितले.