विविध मागण्यांसाठी गुरव समाजाचे १७ मार्चला मुंबईमध्ये आंदोलन
पिंपरी, ता. १० - ''गुरव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर १७ मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. या आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार आहे. '', अशी माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे यांनी दिली.
संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होईल. जेजुरी नगरपालिका नगराध्यक्ष जयदीप बारभाई आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
संघटनेच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने "देवस्थान इनाम वर्ग-३ च्या जमिनींचा प्रश्न मार्गी लावून त्यावरील वतन खालसा करणे, जमिनींचे फेरसर्वेक्षण करुन बेकायदेशीर हस्तांतरण रद्द करणे आणि मूळ सनद धारकांना ताबा मिळवून देणे, सर्व मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के विश्वस्त पदे मिळावीत, पुजाऱ्यांचा वंशपरंपरागत पूजेचा हक्क अबाधित राहावा तसेच ६० वर्षांवरील पुजाऱ्यांना निवृत्ती वेतनासह पाच हजार रुपये दरमहा मानधन तातडीने लागू करावे, या मागण्यांचा समावेश आहे.