इंद्रायणी एक्सप्रेसच्या वाढदिवस समारंभातून उलगडले रेल्वे अन् प्रवाशांचे जिव्हाळ्याचे नाते
इंद्रायणी एक्सप्रेसच्या वाढदिवस समारंभातून उलगडले रेल्वे अन् प्रवाशांचे जिव्हाळ्याचे नाते
पुणे, ता. २९ - दररोज आपण ज्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतो त्या वाहनाशीदेखील आपले एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. रेल्वे आणि प्रवाशांचे हे जिव्हाळ्याचे नाते नुकतेच पाहायला मिळाते....इंद्रायणी एक्सप्रेसच्या वाढदिवस समारंभातून. पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या 'इंद्रायणी एक्सप्रेस' या रेल्वेगाडीचा ३८ वा वाढदिवस प्रवाशांनी सोमवारी (ता. २७) पुणे रेल्वे स्थानकावर समारंभपूर्वक साजरा केला.
या गाडीच्या नियमित प्रवाशांनी या वाढदिवस समारंभाचे आयोजन केले होते. मासिक पासधारकांचा डबा फुलांनी सजवला होता. या डब्यात श्री सत्यनारायण महापूजा मांडली होती. रेल्वेची देखभाल-दुरुस्ती उत्तमरित्या व्हावी तसेच लोकोपायलट, इतर कर्मचारी आणि प्रवासी यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या भावनेने ही पूजा करण्यात आली. .
या समारंभाला रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने समीर मारू, भाईजान मुलाणी, महेश आंबर्ले, रोहित साळवी, मयंक शहा, वासुदेव दाराडे, कुणाल कांबळे, मंगेश ओहाळ, सुजित दळवी, सुधीर झोपे, किशोर नांगवेकर, अजित बनसोडे, मुन्ना तांबोळी, मन्सूर तांबोळी, चिराग पाठक, सुप्रिया शेलार, राजेंद्र ओहाळ, आनंद कट्टी, विशाल मोरे, सुमित खैरनार, महेश साळुंखे, अश्विनी जाधव, महेश खरात आणि नीलमाधव प्रधान यांसह इतर सर्व पासधारक उपस्थित होते.
यावेळी, नियमित प्रवाशांनी गेल्या ३८ वर्षांपासून पुणे-मुंबई प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या या गाडीबद्दल प्रवाशांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित सर्व पासधारकांच्या वतीने इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांचा पुढील प्रवास सुखकारक, मंगलमय आणि सुरक्षित व्हावा, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.