कुरुळीत किरकोळ वादातून मारहाण; दोघांना अटक
पिंपरी, ता. ६ - खेड तालुक्यातील कुरुळी येथील गायकवाड वस्तीमध्ये बुधवारी (ता. ४) किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामरतन नन्हयीप्रसाद साकेत (वय ३६, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड) हे बुधवारी (ता. ४) रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीत झोपलेले होते. यापूर्वी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास चिखलात ढकलल्याच्या कारणावरून फिर्यादी व प्रभातसिंग राजपूत, सुमेर राजू सिंग आणि परबत राजू सिंग यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी सुमेर राजू सिंग व परबत राजू सिंग यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाय, हात व खांद्यावर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कमलभान साकेत यांनाही आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११८(२), ११५(१), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुमेर राजू सिंग व परबत राजू सिंग यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.