'लीडरशिप कॉन्टेस्ट २०२५–२६'.....स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजन
'लीडरशिप कॉन्टेस्ट २०२५–२६'.....स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजन
पिंपरी, ता. ९ - ‘लीडरशिप फेअर’या संकल्पनेअंतर्गत प्रथमच स्वर्गीय अजित पवार लीडरशिप कॉन्टेस्ट २०२५–२६ ही स्पर्धा आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात आली. नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या या स्पर्धेत शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सोल ओंकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३२ शाळांमधून प्राथमिक फेरी घेण्यात आली. अंतिम फेरीत ८१ विद्यार्थी व १६ शिक्षकांनी सहभाग घेतला. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होण्यास मदत झाल्याचे आयोजकांनी सांगितले. शहरी विभागात हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ग्रामीण विभागात कामशेत येथील पंडित नेहरु विद्यालयाने प्रथम स्थान मिळवले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. ज्योती गोगटे, संस्थेचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, सहाय्यक सचिव आत्माराम जाधव, डॉ. अमित देवकुळे आणि प्राचार्य भानुदास मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. ज्योती गोगटे आणि डॉ. अमित देवकुळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतीक्षा वाघमारे यांनी केले.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. ज्योती गोगटे आणि डॉ. अमित देवकुळे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : शहर विभाग - प्रथम : अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, द्वितीय : शारदाबाई पवार इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, खराडी, तृतीय : युऑन सेकंडरी स्कूल, खराडी, ग्रामीण विभाग- प्रथम : पंडित नेहरू विद्यालय, कामशेत, द्वितीय : पिरंगुट इंग्लिश स्कूल, पिरंगुट, तृतीय : श्री शिवाजी विद्यालय, शेल पिंपळगाव, उत्तेजनार्थ : श्री शिवाजी विद्यालय, देहूरोड. शिक्षक गट- संध्याराणी आटोळे, सुरेखा गुळवे, शैली मिश्रा, दत्तात्रेय पोवार, ज्योती तरटे, राजश्री बेल्हेकर आणि मीनाक्षी नरके यांना गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्पर्धा महत्त्वाची.....
“या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून नेतृत्व गुण विकसित होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि संघभावना वाढवण्यासाठी स्वर्गीय अजितदादांच्या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.”
– ॲड. संदीप कदम, मानद सचिव