राज्यभरातील तापमानात वाढ, मार्च महिना उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती
पुणे, ता. २७ - राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिना उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्र, कोकण, मध्य भारत व वायव्य भारतातील अनेक भागांत कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने, शुक्रवारी (ता. २७) राज्यातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी उन्हाची तीव्रता असेल पण हवामान अंशतः ढगाळ राहील असे सांगितले आहे.
गुरुवारी (ता. २६) राजस्थानमधील अलवार येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत कमी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर देशातील सर्वाधिक म्हणजे ३६.६ अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) आणि तमिळनाडूमध्ये होते. तसेच महाराष्ट्रातील निचांकी तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ११.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.