राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ
पिंपरी, ता. २५ - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. आता महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात येणार आहे. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीमधील थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने बुधवारी (ता. २५) याबाबतचा शासन निर्णय काढला आहे.
शासन निर्णयात म्हटले आहे की, १ जुलै २०२५ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के करण्यात यावा आणि १ फेब्रुवारी २०२६ पासून महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीमधील थकबाकी मार्च २०२५ महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येतील.
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे पुढे लागू राहतील, असंही शासन निर्णयामध्ये म्हटलेलंल आहे. वित्त विभागाच्या सहसचिव मुग्धा नि. धुरी यांच्या स्वाक्षरीने हे आदेश देण्यात आलेले आहेत.