मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाची घोषणा
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत "आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल " अशी भूमिका घेते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी आज, बुधवारी (ता. २९) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे बेठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ते मराठा आरक्षण चळवळीसंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
जरांगे पाटील म्हणाले, "सरकारकडून समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता किती वेळ द्यायचा आणि किती नाही, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात कुणबींच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या आधारे सरकारने संबंधितांना प्रमाणपत्रे द्यावीत, अशी आमची मागणी आहे. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आवाहन आहे की, २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करायचे आहे. हे आंदोलन इतक्या ताकदीने उभे करायचे की, मराठा समाजाचे प्रश्न पुन्हा कधीही मागे पडणार नाहीत."
ज्या नागरिकांच्या मराठा समाजाच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करावेत. आजपासूनच आंदोलनाच्या तयारीला लागावे आणि राज्यभरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे.