यमुनानगरमधील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव सुरु करावा - सचिन चिखले
पिंपरी, ता. २६ - यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव लवकर सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे. याबाबत, चिखले यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १३ मधील यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिक व जलतरणपटूंमध्ये नाराजी आहे. तलावातील पाणी न बदलल्यामुळे ते पूर्णपणे हिरवेगार झाले असून परिसरात कचरा व साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी स्थापत्य विभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून तलाव सुरू करण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच तो पुन्हा बंद करण्यात आला. तलाव बंद करण्यामागील कारण स्पष्ट करण्यात आले नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. यमुनानगर, निगडी, साईनाथनगर व सेक्टर २२ येथील जलतरणपटू व नागरिकांनी तलाव बंद असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी नुकत्याच नियुक्त करण्यात आलेल्या एचटूओ एजन्सीने काही नागरिकांकडून वार्षिक पाससाठी शुल्क आकारुन पास दिले होते. मात्र, मुदत पूर्ण होण्यापूर्वीच तलाव बंद केला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन दिल्यानंतर, “ येत्या १५ ते २० दिवसांत तलाव सुरू करण्यात येईल,” असे आश्वासन क्रीडा विभागाचे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी दिल्याचे चिखले यांनी सांगितले. तलाव लवकरात लवकर सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे, असा इशाराही चिखले यांनी दिला. निवेदन देताना शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासोबत मनोज लांडगे, दत्ता देवतरासे उपस्थित होते.