रावेत बंधाऱ्यात सोडले जातेय दूषित पाणी, शहरवासियांच्या आरोग्याला धोका
हा गंभीर प्रकार तत्काळ थांबवण्यासाठी युवासेनेचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. २७ - पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्यात सर्रासपणे सांडपाणी व मैला सोडला जात असल्याची अत्यंत धोकादायक बाब समोर आली आहे. येथे दूषित पाण्याचे नाले नदीच्या पाण्यात सोडले आहे. हेच पाणी दूषित पाणी पुढे शुद्धीकरण प्रक्रियेनंतर शहरवासीयांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. या गंभीर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनाच्या युवासेनेचे उपशहरप्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत, शिंदे यांनी आयु्क्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बंधाऱ्यात दूषित पाणी सोडण्याचा प्रकार वेळेत रोखला गेला नाही तर शहरातील नागरिकांना जलजन्य आजार, संसर्गजन्य रोग तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय असल्याने याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
म्हणून, आयुक्तांनी महापौर, स्थानिक नगरसेवक, विरोधी पक्षनेते, गटनेते, आमदार व खासदार यांच्यासमवेत रावेत बंधाऱ्याच्या परिसराची संयुक्त पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा घ्यावा. तसेच संबंधित विभागाला तातडीने चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. अनधिकृत नालेजोडणी त्वरित बंद करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, असे शिंदे यांनी म्हटले आहे.