अर्थसंकल्प - मुंबई व पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा
पुणे, ता. ६ - राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी (ता. ६) राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. मुंबई व पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मेट्रो प्रकल्प, भुयारी मार्ग अशा विविध प्रकल्पांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
या प्रकल्पांची थोडक्यात माहिती -
- मुंबईतील वाहतूक सुधारण्यासाठी ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीन ड्राईव्ह या विभागात भुयारी मार्ग बांधण्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे ठरले आहे.
- पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा गोरेगाव-मुलुंड भूयारी मार्गाचा पहिला टप्पा आता अंतिम टप्प्यात आला आहे.
- ठाणे ते बोरिवली दरम्यानचा १८ हजार ८३८ कोटी रुपयांचा भुयारी मार्ग जून २०२८ पर्यंत तयार होईल. त्याचप्रमाणे खारघर ते तुर्भे या २ हजार १०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे.
- एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्पांतर्गत वांद्रे-वरळी सागरी सेतूला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडले जाईल. वांद्रे-कुर्ला संकुलाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाईल.
- गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ६ किलोमीटर लांबीचा भूयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदरपर्यंत ९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
- मुंबई मेट्रो ११ हा पूर्णतः भूमिगत मार्ग वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत उभारला जाणार आहे. यासाठी २३ हजार ४८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढे धारावी पुनर्वसन प्रकल्पातून हा मार्ग वांद्रे टर्मिनसपर्यंत विस्तारित होईल.
- मुंबई मेट्रो ८ प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा असेल. यासाठी २२ हजार ८६२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रो २ हा तळोजा ते खांदेश्वरपर्यंतचा मार्ग ५ हजार ५७५ कोटी रुपयांत पूर्ण होईल.
- पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मार्गावर हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गिकांना मंजुरी मिळाली आहे.
- रामवाडी ते वाघोलीपर्यंत ११ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे.
- प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी अखंड संपर्क जाळे निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवून मेटो जाळे १२००
किलोमीटरपर्यंत आणि द्रुतगती मार्गाचे जाळे ६००० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.