पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिकांना प्रवेश करण्यासाठी 'स्वागतम् ई-पास' प्रणाली ९ मे पासून लागू
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिकांना प्रवेश करण्यासाठी 'स्वागतम् ई-पास' प्रणाली ९ मे पासून लागू
पिंपरी, ता. ११ - मंत्रालयाप्रमाणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागरिकांना प्रवेश करण्यासाठी 'स्वागतम् ई-पास' प्रणाली ९ मे पासून लागू झाली आहे.
मंत्रालयातील 'डिजी प्रवेश' प्रणालीच्या धर्तीवर महापालिका आवारातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना डिजिटल सुविधा देण्यासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी महापालिका इमारतीत जाण्यापूर्वी या ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.pcmcindia.gov.in या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी लागेल.
या प्रणालीबाबत महापालिका प्रशासनाने सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रथमच नोंदणी करणाऱ्यांना स्वतःचे खाते तयार करणे आवश्यक आहे, खाते तयार करताना पूर्ण नाव, पत्ता, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक नोंदवावा लागेल, नोंदणी करताना तसेच पुढील प्रत्येक प्रवेशाच्या वेळी नागरिकांचा मोबाइल क्रमांक "ओटीपी" द्वारे प्रमाणित केला जाईल, प्रवेश नोंदताना नागरिकांनी किमान एक आणि कमाल तीन विभागांना भेट देण्याची विनंती नोंदवावी लागेल, नागरिकांना ई-पास काढायच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांपर्यंतचे (शनिवार, रविवार व शासकीय सुट्टया वगळून) उपलब्ध दिनांक दिसतील, त्यानुसार आवश्यक दिनांक व विभाग निवडणे बंधनकारक, नोंदणीनंतर नागरिकांना मोबाइलवर प्रवेशासाठी 'क्यूआर कोड' डाउनलोड करता येईल. हा 'क्यूआर कोड' महापालिका प्रवेशद्वारावरही उपलब्ध असेल, आगाऊ नोंदणी नसणाऱ्यांना 'क्यूआर कोड स्कॅन' केल्यानंतरच प्रवेश मिळेल, पासचा गैरवापर केल्यास गुन्हा नोंदवला जाईल, कार्यालयीन कामकाज किंवा सुट्टीच्या दिवशी महापालिकेतर्फे आयोजित बैठकीस येणाऱ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवेश दिला जाईल, मात्र, त्यासाठी संबंधित विभागाचे पत्र आणि त्यावर भेटणाऱ्यांची नावे आवश्यक असतील, आंदोलनातील शिष्टमंडळांना मुख्य प्रवेशद्वारावर हस्तलिखित पास मिळेल. ई-पासचा गैरवापर, बनावट माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमांनुसार कारवाई केली जाईल.
सूचना -
- संबंधित अधिकारी किंवा विभागाशी पूर्वनियोजित भेट निश्चित करूनच ई-पाससाठी अर्ज करावा
- प्रवेशद्वारावर ई-पासची पडताळणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाईल
- ई-पासमध्ये नमूद वेळ, तारीख व उद्देशासाठीच प्रवेश वैध राहील
- कार्यालयीन कामासाठी विभागांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी सहा अशी राहील
- अधिकाऱ्यांना मंगळवार व गुरुवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत भेटता येईल.