पिंपरी-चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ

पिंपरी-चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ

पिंपरी-चिंचवड मध्ये १६ मे पासून घरयादी व घरगणनेला प्रारंभ

नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, महापालिकेचे नागरीकांना आवाहन 

पिंपरी, ता. १४ - पिंपरी चिंचवड शहरात जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात घरयादी व घरगणनेच्या कामाला १६ मे २०२६ पासून अधिकृत सुरुवात होणार आहे. ही मोहीम १४ जून २०२६ पर्यंत चालणार असून, या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन नागरिकांकडून आवश्यक माहिती संकलित करणार आहेत.

प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना योग्य आणि अचूक माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे. घरयादी व घरगणना ही जनगणनेची अत्यंत महत्त्वाची प्राथमिक पायरी मानली जाते. यामध्ये घरांची संख्या, रहिवाशांची माहिती, मूलभूत सुविधा आदी बाबींची नोंद केली जाते.

या संकलित माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित धोरणे आखते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.

याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, प्रगणकांकडून विचारली जाणारी सर्व माहिती ही पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय धोरणे व विकास नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सहकार्य करावे.आपला छोटासा सहभागही शहराच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.


विश्वासार्ह माहिती अत्यंत महत्त्वाची.....

''देशाच्या विकासासाठी अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जनगणना ही केवळ आकडेवारी संकलनाची प्रक्रिया नसून, भविष्यातील विकास आराखड्याचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय आणि जबाबदारीपूर्ण सहभाग हा देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचा ठरेल. त्यामुळे सर्व पिंपरी चिंचवडकरांनी प्रामाणिकपणे व अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे.''

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी,पिंपरी चिंचवड महानगरपालिका


नागरीकांनी मोहीम यशस्वी करावी....

''घरयादी व घरगणना ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, देशाच्या भविष्यातील नियोजनाचा भक्कम पाया आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करावी.'' -कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories