पुरस्कार हा कर्तृत्वाचा आणि मानवी मूल्यांचा गौरव – डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी, ता. ९ - ''पुरस्कार हा केवळ एखाद्या व्यक्तीचा सन्मान नसून त्याने आयुष्यभर जपलेल्या मानवी मूल्यांचा, कष्टांचा आणि सामाजिक योगदानाचा सार्वजनिक गौरव असतो. पिंपरी-चिंचवड हे आज केवळ उद्योगांचे शहर राहिले नसून वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झालेले शहर आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
‘न्यूज १४ लाइव्ह’चे मुख्य संपादक अविनाश कांबीकर यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी-चिंचवड सन्मान सोहळा २०२६’ कार्यक्रमात डॉ. सबनीस बोलत होते. या वेळी शहराचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजन लाखे यांची प्रमुख उपस्थिती होते.
डॉ. सबनीस म्हणाले, ''प्रत्येक शहराला एक स्वतंत्र चरित्र असते. हे चरित्र केवळ इमारतींनी किंवा विकासकामांनी तयार होत नाही, तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती त्यात वेगवेगळे रंग भरत असतात. पिंपरी-चिंचवड शहराने अशा कर्तृत्ववान व्यक्तींना नेहमीच उचलून धरले असून शहराच्या यशात सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात तिरस्कार वाढताना दिसत असला तरी अशा सकारात्मक पुरस्कार सोहळ्यांमुळे समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण होते.''
यावेळी नवनियुक्त महापौर रवी लांडगे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा विशेष सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ‘न्यूज १४ लाइव्ह’च्या वतीने करण्यात आला.
यावेळी ब्लॅक हॉर्स मोशन पिक्चर्स निर्मित आणि अविनाश कांबीकर दिग्दर्शित ‘MPSC बॉईज’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षांसाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता अविनाश कांबीकर दिग्दर्शित ‘सुलतान’ या लघुपटाचे विशेष प्रदर्शन पत्रकार बांधवांसाठी करण्यात आले होते. अविनाश कांबीकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले. तानाजी साठे यांनी आभार मानले.
‘पिंपरी-चिंचवड सन्मानाचे’ मानकरी - अथर्व अभय कुलकर्णी (कला व संगीत), अरुण पुराणिक (पर्यावरण संवर्धन), डॉ. राजेंद्र काकंरिया (साहित्य व शिक्षण), अनिल मित्तल (उद्योजक व सामाजिक कार्य), संतोष खवळे (कृषी क्षेत्र), कृष्णा ढोकले (गिर्यारोहण व साहसी क्रीडा), श्लोक ताम्हाणे (कुस्ती), श्रीकांत चौगुले (निवेदक व लेखन), पांडुरंग वाघमारे (शैक्षणिक क्षेत्र) आणि प्रद्योत पेंढारकर (सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्र) यांचा समावेश होता.