कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात महाराष्ट्र पोलीस दलाचे योगदान मोलाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात महाराष्ट्र पोलीस दलाचे योगदान मोलाचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, ता. २८ - महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वाधिक व्यावसायिक आणि सक्षम दलांपैकी एक असून कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. राज्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीत पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसारख्या आव्हानांना सामोरे जात अधिक सज्जतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी केले.
पोलीस दलाचे दैनंदिन कार्य अत्यंत आव्हानात्मक असून अशा क्रीडा स्पर्धांमुळे फिटनेस, कौशल्य आणि संघभावना वृद्धिंगत होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दल सातत्याने उज्ज्वल कामगिरी करत आहे. अत्यंत उष्ण वातावरणातही स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुंबई पोलीस व आयोजकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. खेळामध्ये जिंकणे-हरणे यापेक्षा खेळाडू वृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे सांगत सर्व सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कलिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप व बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रीमंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोईर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.