आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर व मिरजकडे ५४ आषाढी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन
पुणे, ता. ३० - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी पंढरीकडे रवाना होतात. यंदाही भाविकांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने वारकऱ्यांसाठी ५४ आषाढी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.
नागपूर, नवी अमरावती, खामगाव, लातूर, भुसावळ, पुणे आणि कोल्हापूर येथून पंढरपूर व मिरजकडे या विशेष गाड्या धावणार असल्याने वारकऱ्यांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-मिरजदरम्यान चार आरक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१२०५ विशेष गाडी २३ व २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक ०१२०६ विशेष गाडी २४ व २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल.
याशिवाय, नवी अमरावती-पंढरपूर चार, खामगाव-पंढरपूर चार आणि लातूर-पंढरपूर आठ फेऱ्यांच्या आरक्षित विशेष गाड्याही चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वारकऱ्यांना थेट पंढरपूर गाठणे अधिक सोयीचे होणार आहे. अनारक्षित प्रवाशांसाठीही मध्य रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. भुसावळ-पंढरपूर चार, कोल्हापूर-कुडूवाडी १६ आणि पुणे-मिरज १४ अशा एकूण ३४ अनारक्षित विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे पंढरपूर परिसरासह पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या प्रवासालाही मोठा दिलासा मिळणार आहे.
उद्यापासून आरक्षण सुरू
आरक्षित विशेष गाड्यांचे आरक्षण १ जुलै २०२६ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच 'आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित गाड्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे उपलब्ध असतील. आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी झाल्यास आवश्यकतेनुसार आणखी विशेष गाड्या चालविण्यात येतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.