राज्यभरात ५ हजार १११ केंद्रावर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून, ५५४ केंद्र सीसीटिव्हीविना
पुणे, ता. १९ - राज्यभरात २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. त्यातील ५५४ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत. राज्यात १९१ संवेदनशील केंद्रे असून, त्यातील ४२ केंद्रांवर सीसीटीव्ही शिवाय परीक्षा होणार आहे, अशी माहिती आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रमुख नंदकुमार बेडसे यांनी दिली.
दहावीच्या परीक्षेच्या काळात गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन केली आहेत. मंडळ सदस्य आणि जिल्हास्तरीय शासकीय अधिकारी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार आहेत. सीसीटीव्ही नसलेल्या ५५४ केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबरला बैठक झाली. यात दिलेल्या आदेशानुसार, परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडित कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे बेडसे यांनी सांगितले.