*‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० व्या शहीदी समागमाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन....*
पिंपरी, दि. ११ फेब्रुवारी २०२६ : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ .३० वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे पार पडणाऱ्या या बैठकीस उप महापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमांता बिस्वा सरमा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील सिख, सिकलकर,बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकी) संप्रदायासह नागरिकही मोठ्या संख्येने गुरू तेग बहादुर यांचा इतिहासाला उजाळा देण्यासाठी एकत्र येतात.
पिंपरी चिंचवड शहरातून देखील मोठ्या संख्येने भाविक या समागमामध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समागमाच्या आयोजनाची रूपरेषा, विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन, तसेच आवश्यक प्रशासकीय समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध सामाजिक संघटना, धार्मिक संस्था व समाज प्रतिनिधी यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याने संबंधित प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.