किवळे, रावेत व मामुर्डी परिसरातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा..........नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
किवळे, रावेत व मामुर्डी परिसरातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा
नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी, ता. ७ - प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे, रावेत व मामुर्डी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रासले आहेत. या परिसरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास रावेत पंपिंग स्टेशन बंद करु असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी दिला आहे. या संदर्भात तरस यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, किवळे, रावेत व मामुर्डी भागासाठी सुमारे १८०० क्यूबिक मीटर पाण्याची आवश्यकता असताना सध्या केवळ १६०० ते १६५० क्यूबिक मीटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम होत असून घरगुती वापर, शाळा तसेच इतर आवश्यक कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. रावेत येथील पंपिंग स्टेशनमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी असल्याचेही निदर्शनास आले आहे. यावर त्वरित तोडगा काढून प्रभाग १६ मध्ये नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु करावा.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रावेत येथील शहराला पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन बंद केले जाईल, असा इशारा ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे.