राज्यभरात ऊन्हाचा पारा वाढला, अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
पुणे, ता. ४ - राज्यभरात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या कडक ऊन्हाने नागरीक हैराण होत आहेत. सायंकाळीही वातावरणात गरमी जाणवत आहे.
मंगळवारी (ता. ३) विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्या पाठोपाठ अमरावती येथे ३८.२ अंश सेल्सिअस वर्धा येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वाधिक कमी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.