महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलैपर्यंत विशेष सखोल मतदार पुनर्रिक्षण (एसआयआर) मोहीम, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती
महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलैपर्यंत विशेष सखोल मतदार पुनर्रिक्षण (एसआयआर) मोहीम, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती
पुणे, ता. २५ - ''भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनर्रिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे.'', राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयातील मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात शुक्रवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. घराघरात भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्म द्वारे मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लीकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे. २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.
या मोहीमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून २० ते २९ जूनदरम्यान गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील.५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, तर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. ७ ऑक्टोबर २०२६ ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील सुमारे १ लाख २५३ हजार बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट्स या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकरीत्या वगळले जाणार नाही, अशी ग्वाही एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.