शहराला दररोज पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, मल्हार आर्मीची मागणी
पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शहराला दररोज पूर्ण दाबाने पाीपुरवठा करावा, अशी मागणी मल्हार आर्मीने केली आहे.
याबाबत, मल्हार आर्मीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दीपक भोजने यांनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात कधी पाईपलाईन फुटली किंवा जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती (मेन्टेनन्स) असेल तर दुसर्या दिवशी पाणी कमी दाबाने येते त्यामुळे सोसायटीच्या टाक्या भरत नाहीत त्यामुळे सोसाट्यांना पाण्याचे टँकर बोलवावे लागतात.
अशीच परिस्थिती बैठी घरे आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांची आहे. त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षांनी २४ बाय ७ पाणी पुरवठा करु असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, २४ बाय ७ नाही तरी शहरात किमान दररोज पूर्ण दाबाने पाणी पुरवठा व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे. महापौरांनी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे.