पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनंतर लागला निकाल
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनंतर लागला निकाल
पुणे, ता. २० - धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील एक प्रमुख राजकारणी पवनराजे निंबाळकर यांची सन २००६ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणाचा निकाल तब्बल २० वर्षांनंतर आज शनिवारी (ता. २०) लागला. सीबीआय विशेष न्यायालयाने सर्व ९ आरोपींची पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे,
पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी कळंबोली (पनवेल) येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कळंबोली पोलिसांकडे होता. त्यानंतर तो नवी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र, तपासावर आक्षेप घेत पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले.राजकीय वैरातून २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला होता.
सीबीआय'ने या प्रकरणात १२७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते, तर एका आरोपीला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. या खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जण आरोपी होते. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
निकाल देताना न्यायालयाने, आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. तपासात त्रुटी राहिल्या आणि माफीच्या साक्षीदाराने वारंवार बदललेल्या साक्षी या बाबी अधोरेखित केल्या. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनलेल्या आरोपीने आपली साक्ष वारंवार बदलली. त्यामुळे त्याने दिलेली साक्षही ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायमूर्तीनी निकाल देताना नमूद केले आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. " लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे," अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
- धाराशिव, Dharashiv, उस्मानाबाद, Osmanabad, कळंबोली, Kalamboli, पनवेल, Panvel, नवी मुंबई गुन्हे शाखा, Navi Mumbai Crime Branch
- निर्दोष मुक्तता, Acquittal, २० वर्षांनंतर निकाल, Verdict after 20 years
- सीबीआय विशेष न्यायालय, CBI Special Court
- पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, Pawanraje Nimbalkar murder case