प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशभरात महाराष्ट्र आघाडीवर
पुणे, ता. ६ - प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सबंध देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ४ लाख ६५ हजार नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत तब्बल १ हजार ७२२ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सौरऊर्जा वापराला चालना देण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना लागू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रात महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या संबंधित ग्राहकांना केंद्र सरकारचे अनुदान मिळाले आहे आणि सूर्यघर वीज योजनेचा लाभ घेतल्याने त्यांचे वीजबील कमी झाले आहे.
'महावितरण'ने सौरग्राम योजना सुरु केली असून, आतापर्यंत १७ गावे 'सौरग्राम' झाली आहेत. या योजनेत राज्य सरकारने वीज ग्राहकाला मिळणाऱ्या अनुदानात स्वतःकडून भर घालून दारिद्र्यरेषेखालील पाच लाख कुटुंबांना अत्यंत कमी रकमेत योजनेचा लाभ मिळवून देणार आहे.