'आरटीई' अंतर्गत प्रवेशासाठी सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांचे प्रवेश २० एप्रिलपर्यंत निश्चित करावेत, शिक्षण विभागाचे आवाहन
'आरटीई' अंतर्गत प्रवेशासाठी सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांचे प्रवेश २० एप्रिलपर्यंत निश्चित करावेत, शिक्षण विभागाचे आवाहन
पुणे, ता. ११ - 'आरटीई' अंतर्गत शाळा प्रवेशासाठी सोडत नुकतीच पार पडली. त्यानुसार, सर्वसाधारण गटातील १ लाख ५ हजार २२९ आणि दिव्यांग गटातील ५८२ बालकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या मुलामुलींचे प्रवेश शनिवारपासून (ता. ११) निश्चित करता येणार आहेत. सोडतीद्वारे प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी २० एप्रिलपर्यंत आपल्या बालकांचे प्रवेश निश्चित करावेत, , असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आरटीई कारयद्यांतर्गत शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सहा एप्रिलला ऑनलाइन सोडत पार पडली. त्यानुसार, शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या पाल्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण आठ हजार ७०१ पात्र शाळांमधील एक लाख १४ हजार ८२६ रिक्त जागांवरील प्रवेशासाठी एकूण दोन लाख ८९ हजार ३८५ अर्ज आले होते. सर्वसाधारण प्रवर्गातून एकूण एक लाख पाच हजार २२९ बालकांची, तर दिव्यांग प्रवर्गातून ५८२ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. प्रतीक्षा यादीत सर्वसाधारण संवर्गातून ८६ हजार चार आणि दिव्यांग संवर्गातून ३० बालकांची निवड जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना शुक्रवारपासून (ता. १०) त्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एनआयसीद्वारे 'एसएमएस' प्राप्त होत आहेत. पालकांनी केवळ 'एसएमएस'वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर किंवा 'https://student.maharashtra.gov.in/adm_portal' या संकेतस्थळावर सोडतीत निवड झाली आहे की नाही, याची तपासणी करावी.
सोडतीत निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्याकडे जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी, पडताळणी समितीमार्फत करावी. पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता कागदपत्रांची तपासणी करुन प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रत देण्यात येईल. सोडतीद्वारे प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी २० एप्रिलपर्यंत बालकांचे प्रवेश निश्चित करावेत, , असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.